मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

जगण्याने छळले होते… मरणाने सुटका केली..!

(सोन्याचा दिवस : 2)

(हा लेख वाचण्यापूर्वी शुक्रवार, दि. 6 मे 2011 रोजी अपलोड केलेला 'सोन्याचा दिवस' हा लेख वाचावा. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://priydarshan.blogspot.in/2011/05/blog-post_06.html)

आज पुन्हा अक्षय्य तृतीया… गेल्या वर्षी या दिवशी मी केवढा खूष होतो. पण आज वर्षानंतर माझा प्रिय मित्र प्रशांत आंबोले याच्या आठवणीनं दुःखाचा उमाळा दाटून येतो आहे. अक्षय-तृतीया ते अक्षय तृतीया… हा एक वर्षाचा कालावधी फारसा काही मोठा नसला तरी गेल्या वर्षी माझा मित्र (हयात) होता.. तो आनंदात होता… मात्र आज एक वर्षानंतर तो आपल्यात नाहीय.. आणि मी दुःखात आहे.
गेल्या वर्षी या दिवशी प्रशांतनं मला त्याचं (दुसरं) लग्न ठरल्याची बातमी दिली आणि त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाला आता तरी पूर्णविराम मिळेल आणि त्याचं उर्वरित आयुष्य सुखात जाईल, या विचारानं मी आनंदून गेलो होतो. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आम्हा दोघांवर ती अधिक खदखदून हसत होती. मला मात्र त्याची काहीच कल्पना नव्हती.
प्रशांतचं लग्न ठरल्याप्रमाणं झालं. माझ्या सर्व मित्रांनीच पुढं होऊन त्याचं लग्न लावून दिलं. सांगावकर बंधूंचं योगदान त्यामध्ये अधिक महत्वाचं होतं. जयू, गजा, संतोष, बबलू अशा सर्वांनीच प्रशांतचं भलं व्हावं, म्हणून कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता लग्नाच्या जेवणासह सर्व खर्च केला. त्या सर्वांच्या पत्नी सुद्धा प्रशांत भाऊजीच्या लग्नात नुसत्या सहभागीच झाल्या नाहीत, तर घरचं कार्य असल्यासारखं सर्व कामं पुढाकार घेऊन केली. सर्वांची एकच भावना होती की, प्रशांतचं भलं व्हावं. त्या लग्नाला मी जाऊ शकलो नाही, पण आई, बाबा आणि भाऊ अनुप आवर्जून सहभागी झाले.
त्यानंतरच्या रविवारी मी घरी गेलो, तेव्हा प्रशांतला त्याच्या नूतन पत्नीसह घरी जेवायला बोलावलं. त्यावेळी, प्रशांतनं माझ्यावर बॉम्बच टाकला. तो म्हणजे, त्याच्या या नव्या पत्नीला पूर्वीच्या विवाहातून दोन-तीन वर्षांची एक मुलगी होती. काहीतरी कारणानं पहिल्या नवऱ्याशी फारकत घेऊन ती माहेरीच राहात होती. प्रशांतनं तिच्या मुलीसह तिला स्वीकारण्याएवढं मन मोठं केलं होतं. हे त्यानं मला आधी सांगितलं नव्हतं. पण, आता ही गोष्ट समजल्यानंतर मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. "तू एक अतिशय धाडसी निर्णय घेतला आहेस. दुसऱ्याच्या मुलाचं पितृत्व स्वीकारण्यासाठी फार मोठं काळीज असावं लागतं. पण तू आता निर्णय घेतलाच आहेस, तर तो निभावण्याचं बळ तुला लाभो," असं मी त्याला स्पष्ट सांगितलं.
जेवणानंतर त्याच्या बायकोलाही प्रशांतनं आजवर सोसलेल्या यातना, त्याच्या आईच्या आजारपणाचं गांभिर्य आणि त्या दोघांच्या दृष्टीनं असलेलं तिचं महत्त्व व जबाबदारी या दोन्ही गोष्टींबद्दल अगदी पोटतिडकीनं समजावून सांगितलं. एक मुलगी होऊनही ती तशी अल्लडच वाटली. त्यामुळं माझ्या मनातली शंका आणखीच दाट झाली. पण कुठंतरी आशेचा किरण होताच!
पुढच्या वेळी गावी गेलो, तेव्हा प्रशांतच्याच रिक्षातून घरी निघालो होतो. वाटेत, त्यानं भाजीपाला विकत घेतला. मनात म्हटलं, पठ्ठ्याच्या संसाराची 'रिक्षा' चांगली मार्गाला लागलेली दिसतेय. तो आनंदातही दिसला.
मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. महिना- दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा काही कारणानं मी गावी गेलो, तर तेव्हा मला बबल्या भेटला. प्रशांतच्या घरी बायकोशी कुरबुरी सुरू झाल्याचं त्यानं सांगितलं. मी प्रशांतला भेटलो, त्याला थेटच विचारलं, काय झालं ते सांग, म्हणून. ब्रेन हॅमोरेजनं आंधळ्या-लुळ्या झालेल्या त्याच्या आईला ती अजिबातच पाहात नव्हती. प्रशांत घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिचं सारं आवरत होताच. पण तो रिक्षा घेऊन बाहेर पडल्यापासून ते संध्याकाळी जेवायला परतेपर्यंत आईकडं अजिबातच लक्ष दिलं जात नव्हतं- तिचं खाणं, पिणं, औषधपाणी आणि स्वच्छता- कशाकशाकडंही! आईचं बोलणंही अस्पष्ट झाल्यानं घशातून चित्रविचित्र आवाज काढून ती काही सांगायचा प्रयत्न करायची, पण सून अजिबात ऐकतच नव्हती. एकदा तर वैतागून तिनं सासूच्या कमरेतच लाथ घातली. ही गोष्ट प्रशांतला समजली मात्र, त्याच्या मनानं पुन्हा हाय खाल्ली.
आईसाठी म्हणून पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतल्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला होता. बायकोला समजून सांगायचा प्रयत्न त्यानं केला तरी ती काही ऐकतच नव्हती. तिच्याबद्दलच्या आपुलकीचा प्रशांतच्य मनातला झरा आपोआप आटू लागला. त्याचा स्वभाव हा कधी मनमोकळं बोलण्याचा नव्हताच. पुन्हा मनातल्या मनात कुढणं सुरू झालं. पुन्हा त्याची पावलं ड्रिंक्सकडं वळू लागली. बबल्याचे अधूनमधून फोन यायचे. मी फोनवरुनच प्रशांतची समजूत काढायचा प्रयत्न करायचा. पण सारं व्यर्थ ठरत होतं. 'तुझ्या बायकोला आपण माघारी पाठवू; मात्र, तू स्वतःला सावर,' इथंपर्यंत समजावून सांगितलं. पण विकल हसण्यापलिकडं त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता.
दि. 29 सप्टेंबर 2011… सायंकाळी साडेसहा-पावणेसातचा सुमार असेल… मंत्रालयात माझ्या ऑफिसमध्ये बसून मी एक भाषण तयार करत होतो. एवढ्यात माझा भाऊ अनुपचा फोन आला. तो निपाणीपासून जवळच असलेल्या शेंडूरला त्याच्या मित्राकडं गेला होता. तिथनंच तो बोलत होता. "दादा, अरे प्रशांतदादानं घरात कोंडून घेऊन फास लावून घेतलाय म्हणे. मला नितीनचा आताच फोन आला होता." अनुपचा स्वर रडवेला झाला होता. मी त्याला म्हटलं, "घाबरु नको. तसं काही नसेल. तू लगेच तिकडं जा आणि नक्की काय झालंय ते मला सांग. टेन्शन घेऊ नको." अनुपला तसं सांगत असताना, माझ्या मनाची घालमेल मात्र प्रचंड वाढली होती.
कसंबसं भाषणाचा मजकूर मी पुढं रेटत राहिलो. पंधरा ते वीस मिनिटांतच अनुपचा पुन्हा फोन आला. "दादा, आपला प्रशांतदादा गेला रे.." असं मला सांगतानाच त्याला रडू आवरेना. आता त्याला मी आवरणार तरी कसा होतो? प्रशांतही त्याला माझ्याइतकाच प्रिय होता. अशा प्रिय व्यक्तीनं घरातल्या पंख्याला गळफास लावून घेतल्याचं भीषण दृष्य जर त्याला खिडकीतून दिसलं असेल तर सावरणं कदापि शक्य नव्हतं. तरीही मी त्याला विचारलं, "काही आशा आहे का रे?" "दादा, सगळं संपलंय रे…" माझ्या मनातली उरलीसुरली आशाही संपली. अंगातलं त्राणच संपलं. बसल्या जागी मी सुन्नबधीर झालो. किती तरी वेळ मी तसाच बसून होतो.  भाषणावर यांत्रिकपणे अखेरचा हात फिरवला. पीएसना फोन केला. त्यांना परिस्थिती सांगितली आणि त्यासाठी गावी जात असल्याचं सांगितलं. आता एकच आशा होती, मित्राच्या 'अंत्यदर्शनाची'! ट्रॅव्हलवाल्या मित्राला फोन करून एक जागा ठेवायला सांगितली आणि निघालो. दरम्यानच्या काळात घरी बाबा, अनुप आणि इतर मित्रांशीही बोलणं सुरू होतं. या अखेरच्या क्षणीही पुन्हा सांगावकर बंधू धावून आले. त्यांच्या दबदब्यामुळं पंचनामा, पोस्ट मॉर्टेम या गोष्टी पटापट पार पडल्या आणि रात्री साडेबाराच्या सुमारास मला बाबांचा फोन आला- अंत्यसंस्कार झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशीच राख सावरण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मित्राचं अंत्यदर्शन नसलं तरी त्याची राख पाहावी लागणार होती मला!
सकाळी घरी पोहोचलो. सकाळी साडेआठची वेळ ठरली होती, पण प्रशांतचं दुर्दैव पाहा. त्याच्या भाच्यानं जाऊन पाहिलं, तर प्रेत व्यवस्थित जळालेलं नव्हतं. त्यामुळं पुन्हा चिता पेटवावी लागली. आयुष्यभर जळल्यानंतर मेल्यावरही दोनवेळा जळणं, माझ्या मित्राच्या नशिबी आलं होतं.
स्मशानात गेलो, राख अजूनही धुमसत होती. प्रशांतनं ज्यांच्यावर आणि ज्यांनी त्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, असे त्याचे सारे मित्र या वेळी त्याच्या राखेभोवती गोळा झाले होते. आतल्या खोलीत आपल्या मुलानं फास लावून आत्महत्या केली आहे, याची बाहेरच्या खोलीत असलेल्या त्याच्या अधू आईला काहीच कल्पना नव्हती. बाहेरचं काहीच तिच्या आतपर्यंत पोहोचत नव्हतं. ज्या आईसाठी प्रशांतनं आयुष्यभर आटापिटा केला, त्या आईला आपला मुलगा गेल्याचं समजलंच नव्हतं, हे सुद्धा माझ्या मित्राच्या नशिबी आलेलं आणखी एक प्राक्तन! त्याची बहीण आणि भाचा, नात्यामुळं केवळ पर्याय नव्हता, म्हणून तिथं उपस्थित होते, इतकंच. स्मशानातल्या विधी दरम्यान, त्याच्या बायकोनं बांगड्या फोडायला नकार दिला. तिला सक्ती करण्यात काहीच अर्थ नव्हता. आमचा मित्र गेला आणि आमच्या दृष्टीनं सारंच संपलं होतं. अक्षयतृतीयेपासून प्रशांतच्या आयुष्यात आलेल्या त्या मुलीनं त्याला त्या वर्षीचा दसराही पाहू दिला नव्हता, असं माझ्या मनानं घेतलं. दोन सोन्याच्या दिवसांदरम्यान माझा मित्र होत्याचा नव्हता झाला होता.
माझ्या मुलाच्या बारशाच्या नियोजनात त्याला महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची होती. अनुपनं त्याच्या मृत्यूच्या दिवशीच त्याला ही गोष्ट सांगितली होती. प्रशांत अनुपशी, बबलूशी दुपारी बोलला होता आणि सायंकाळी घरी जाऊन शांत चित्तानं त्यानं आत्महत्या केली होती. एका शब्दानंही कुणाला काही बोलला नव्हता. कदाचित, त्यानं मला फोन केला असता तर.. मी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न तरी केला असता. पण, या जर - तर ला काहीच अर्थ नसतो.
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना, घडामोडींचा, माझ्या पहिल्या लेखाचा, कथेचा, कवितेचा, कादंबरीचा, प्रेमाचा, प्रेमभंगाचा, पहिल्या नंबरचा, विजयाचा, पराजयाचा अशा सर्वच गोष्टींचा साक्षीदार असलेला प्रशांत आज माझ्यासोबत नाही. एखादा लेख लिहिताना त्याचं पहिलं वाचन करणारा प्रशांत आता नाहीय, ही कल्पनाच सहन होत नाही. आजही निपाणी स्टॅन्डवर पोहोचण्यापूर्वी "आहेस का स्टॅन्डवर?" असं त्याला विचारण्यासाठी माझा हात मोबाईलकडं जातो. मग अचानक, प्रशांत आता आपल्याला कधीही पिकअप करणार नाही, ही गोष्ट लक्षात येऊन मी स्टॅन्डला उतरून रिक्षा स्टॉपकडं न जाता सरळ चालायला सुरवात करतो.
प्रशांतचा मृत्यू म्हणजे भीमराव पांचाळे यांच्या गझलेतल्या 'जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली', या जळजळीत वास्तवाचं प्रत्यंतरच ठरला. प्रशांतनं त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या आत्महत्येनं एक 'मास्टर' उत्तर देऊन टाकलं होतं. त्याच्यापुरते सारे प्रश्न सुटले होते; नव्हे, मागच्यांचेही कित्येक प्रश्न त्यानं जाता जाता सोडविले होते. आता ताईला त्या संपूर्ण घराचा ताबा मिळेल, आई मरेपर्यंत तिला ती पाहील, बायकोला पुन्हा माहेरी जाऊन पुढचा निर्णय घेण्यासाठी मोकळीक, भाच्याला कायमस्वरुपी रिक्षा, असे किती तरी प्रश्न सुटले होते. त्यामुळं आता त्याच्या जाण्याचं कुणाला दुःख वाटण्याचंही कारण नव्हतं.
त्या दिवशी स्मशानातून परत फिरल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत आजतागायत मी प्रशांतच्या घरी गेलेलो नाही. जाण्याचं कारणच संपलं होतं. परवा आत्याच्या घरून स्कूटरवर परतताना वाटेत त्याचं घर लागलं. भर ग्रीष्मातल्या दुपारी आभाळ भरून आलं आणि पावसाचे टपोरे थेंब माझ्या अंगावर पडले. जणू, प्रशांत मला त्याच्या आईचा हालहवाला विचारण्यासाठी जायला सुचवत होता. मी मनातल्या मनात त्याची माफी मागितली. माझ्या मित्राचा काळ ठरलेल्या त्या घरात पाऊल न ठेवण्याचा माझा निश्चय मी मोडणार नाही, असं त्याला स्पष्ट बजावलं. पावसाची तीव्रता वाढली. घरी पोहोचेपर्यंत चिंब भिजलो होतो- वरुनही आणि आतूनही!

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

शिवरायांचं मोठेपण!


छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. नुकताच 'राजा शिवछत्रपती' या मालिकेवरुन निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटाबद्दल माझ्या एका मित्रानं फेसबुकवर हा चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केलं आहे. अतिशय सुरेख आणि सळसळतं असं आवाहन आहे, त्यात त्यानं म्हटलंय की, "तलवारी तर सगळ्याच्यांच हातात होत्या. ताकत ही सगळ्याच्यांच मणगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची उत्तुंग इच्छा फक्त 'मराठ्यांच्या' रक्तातच भिनलेली होती. ही शक्ती छ.शिवाजी महाराजांनी जानली होती, म्हणून तर अफजल खानाच्या रक्ताने प्रतापगडाची पायरी धूतली होती... मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान, ‘मी मराठी…’ या दोन शब्दातच माझी ओळख आहे... मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही" आता आमचा मराठी बाणा- "मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही ", "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा"
- यासाठी नुकताच प्रदर्शित झालेला “राजा शिवछत्रपती” हा चित्रपट प्रत्येक शिवभक्त मराठ्याने सहकुटुंब-मित्रपरिवारासह जाऊन आवर्जून पहावा. दबंग-बॉडीगार्ड यासारखे टुकार चित्रपट जर सुप्परहिट्ट होत असतील तर मग आपले आराध्य दैवत 'शिवछत्रपती' वरील चित्रपटाने तर विश्वविक्रम केला पाहिजे. तेंव्हा निर्धाराने बाहेर पडा...."
मित्राच्या आवाहनात सकृतदर्शनी गैर असं काही नाही. चित्रपट पाहावा आणि त्या माध्यमातून आपलं शिवप्रेम व्यक्त करावं, यालाही कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. पण हा चित्रपट असो की मालिका, या दोन्ही बाबींचा शेवट शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगानं करण्यात आलाय. किंबहुना, माझ्या पाहण्यात आलेल्या शिवाजी महाराजांवरील बऱ्याच चित्रपटांचा शेवट हा याच प्रसंगानं झाल्याचं मला दिसलं. हिंदी चित्रपटात जसं नायक-नायिकेच्या विवाहानं '...ॲन्ड दे लिव्ह्ड हॅप्पीली फॉरेव्हर!' असा शेवट केला जातो, तसा शिवरायांवरील चित्रपटांचा तद्दन सिनेमॅटिक शेवट केल्याचं दिसतं. पण प्रत्यक्षात शिवरायांनी राज्याभिषेकानंतरच्या कालखंडात अतिशय झंझावाती पद्धतीनं, प्रजाहिताच्या दृष्टीनं असा कारभार केलेला आहे. फक्त त्यामध्ये कुठं फारसं चमत्कृतीपूर्ण असं काही घडलं नाही. त्यामुळं त्या कारभाराशी आम्हाला काही देणंघेणं नसावं कदाचित!
पण माझ्या मते, शिवरायांचं मोठेपण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चमत्कृतीपूर्ण घटनांत नाहीयेच मुळी. स्वराज्य प्रस्थापनेबरोबरच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या रयतेची ज्या पद्धतीनं काळजी वाहिली, त्यामध्ये त्यांचं मोठेपण सामावलं आहे. राज्याभिषेकानंतरच्या काळात त्यांनी ज्या लोकाभिमुख पद्धतीनं कारभार केला, त्याला तोड नाही. रयतेच्या शेतातल्या पिकाच्या देठालाही धक्का न लावता जाण्याचा आदेश बजावणारा हा 'जाणता राजा', त्या काळातल्या इतर साम्राज्यविस्तारवादी राजा-बादशहांच्या मांदियाळीत वेगळा न ठरता तरच आश्चर्य!
छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर अतिशय महान असा 'लोकराजा' होते. तसं पाहता, त्या काळातील राजकीय गरजेपोटी त्यांना काही धाडसी पावलं उचलावी लागली. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, तोरण्याची जीत, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोट छाटणी, मिर्झाराजे जयसिंहांशी तह, आग्र्याहून सुटका, सूरतेची लूट या आणि अशासारख्या घटनांनी त्यांच्या जीवनचरित्राला एक वेगळं क्षात्रतेज प्रदान केलं. वीररसानं भारलेलं असल्यानं सर्वसामान्य जनतेलाही ते आजतागायत भारावून टाकणारं ठरतंय. पण या घटना म्हणजेच शिवरायाचं मोठेपण, असं मानणं यासारखा दुसरा कोतेपणा नाही. खरं तर, या घटनांना समांतर आणि शिवराज्याभिषेक झाल्यानंतरही शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपल्या रयतेची काळजी वाहिली आणि सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या मनात जे आदराचं स्थान प्राप्त केलं, ते अढळस्थान हेच शिवरायांचं खरं सिंहासन ठरलं.
ज्येष्ठ विचारवंत ॲड. गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' या छोटेखानी पुस्तिकेत शिवरायांचं खरं मोठेपण आणि राजेपण कशात आहे, याचा अतिशय सुरेख आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे.
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्याला प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.
शिवाजी महाराजांविषयी प्रसृत केलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे `महाराज हे केवळ हिंदूंचे राजे होते आणि त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराचीच भावना होती.' अर्थात हा असा गैरसमज समाजात पसरवण्यामागचं 'राजकारण' काय आहे, ते सांगण्याची गरज नाही. पानसरे यांनी आपल्या लेखनातून हा गैरसमज ठामपणे खोडून काढला आहे.
पानसरे लिहितात : "शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असं म्हणावं, तर मग राणा प्रताप वा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत?... शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते... मग असं का व्हावं?...''
त्याचं उत्तरही पानसरे यांनी देऊन टाकलं आहे. त्यांच्या मते 'हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजी महाराजांना यश प्राप्त झालं, हे खरं नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी महाराज आणखी काहीतरी चांगलं करायला निघाले होते, असं दिसतं...'' काय होतं हे चांगलं काम?
तर, महाराजांच्या मनात आपलं राज्य, सत्ता वा अंमल प्रस्थापित करायची गोष्ट आली, त्याचं कारण त्या काळातले, वतनदार, जमीनदार, सुभेदार आणि पातशहा यांच्याबरोबरच पाटील-कुलकर्णी आदी मंडळींनी गोरगरीब रयतेवर चालवलेले अत्याचार हे होतं. त्या अत्याचाराच्या विरोधात महाराजांनी मोठा लढा दिला आणि आपला अंमल प्रस्थापित केला. असा लढा देऊन उभ्या राहिलेल्या सत्तेला दुसऱ्या कोणावर अन्याय करण्याचा नैतिक हक्क तर नव्हताच शिवाय, या लढ्यासाठी समाजाच्या तळागाळातून उभी राहिलेली जनताही, त्या सत्तेला म्हणजेच- महाराजांना सोडून गेली असती.
अर्थात, केवळ राज्य जाईल म्हणून महाराजांनी रयतेला प्रेमानं वागवलं, असं नाही तर त्यांच्या मनातच `आम आदमी'विषयी कशी जिव्हाळ्याची भावना होती, ते अनेक उदाहरणांनिशी पानसरे यांनी दाखवून दिलं आहे. महाराजांच्या सैन्यात केवळ मुस्लिम सरदारच नव्हे तर सैनिकही होते. त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराची भावना असती, तर असा धोका त्यांनी पत्करला असता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याचा अर्थ शिवाजी महाराज हे धर्मच मानत नव्हते वा ते निधर्मी होते किंवा त्यांनी आपलं राज्य निधर्मी म्हणून घोषित केलं होतं, असा मात्र नाही. महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत होते... पण याचा अर्थ ते मुस्लिम धर्माच्या विरुद्ध होते, असा मात्र घेता उपयोगाचा नाही. सभासदाच्या बखरीत बखरकार म्हणतात : ``मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालवले...'' यावरुनच त्यांची धर्मनिरपेक्षता सिद्ध होते.
महाराजांविषयी असलेला किंवा काही मतलबी मंडळींनी पसरवलेला आणखी एक गैरसमज म्हणजे महाराज हे फक्त मराठ्यांचेच राजे होते. प्रत्यक्षात चित्र काय होतं? शिवाजीच्या सहकाऱ्यांमध्ये सर्व जातिधर्माचे लोक होते. न्हाव्यांपासून मराठ्यांपर्यंत आणि ब्राह्मणांपासून प्रभू-शेणवींपर्यंत सर्वांचा गोतावळा शिवाजी महाराजांनी उभा केला होता... शिवाजी महाराजांच्या यशाचे रहस्य या सर्वसमावेशकतेत आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची शिवरायांनी घेतलेली काळजी सुद्धा त्यांच्या मोठेपणाचं द्योतक आहे. राजांनी प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना लिहिलेले ५ सप्टेंबर १६७६ चे पत्र आजही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. "पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे कर्ज द्यावे. पीक आल्यावर त्यांच्याकडून मुद्दल तेवढे घ्यावे, व्याज घेऊ नये. यासाठी सरकारी खजिन्यातून दोन लाखांपर्यंत रक्कम खर्च पडली तरी हरकत नाही. शेतकऱ्याला जर मुद्दलही फेडणे शक्य नसेल तर त्याला तेही माफ करावे," असे शिवाजी महाराजांनी त्या पत्रात म्हटले होते. याचा अर्थ शेतकऱ्यांची गरज बघून त्याला शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफी द्यावी, असा हुकूम शिवाजी महाराजांनी केला होता. महाराजांचा जयजयकार करत असताना त्यांच्या या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श आपण घेण्याची गरज आहे.
याच कारणामुळं महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपतींचा जो पोवाडा लिहिला, त्यामध्ये 'कुळवाडी भूषण' असा त्यांचा सार्थ गौरव केला आहे.
हे होतं शिवरायांचं खरं मोठेपण; पण आपण अफझलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाच्या फजितीमध्ये ते शोधतो आणि इथंच खरी गल्लत होते, असं माझं स्पष्ट मत आहे.