सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

निखळ २२ : माझं विद्यापीठ..!




(आज, सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2013 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त लेख..) 
वाचक हो, जेव्हा आपण हा लेख वाचत असाल, तेव्हा इथं कोल्हापुरात माझ्या शिवाजी विद्यापीठाचा 51 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असेल. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वासुदेव गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठामध्ये गुणवंत शिक्षक, कर्मचारी आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा रंगलेला असेल.
मित्र हो, मी या विद्यापीठाला जेव्हा माझं विद्यापीठ असं म्हणतो, तेव्हा ते केवळ मी इथं काम करतो, नोकरी करतो म्हणून नव्हे, तर आज मी जो काही आहे, तो या विद्यापीठामुळंच आहे, म्हणून! साधारण वीस वर्षांपूर्वी बारावीची परीक्षा दिल्यानंतर या विद्यापीठाशी शिक्षण आणि परीक्षांसाठी माझं विद्यार्थी म्हणून जुळलेलं नातं आजतागायत कायम आहे. बारावीचं काय घेऊन बसलात? अगदी लहानपणापासूनच जेव्हाही कधी कागलहून कोल्हापूरला किंवा उलट प्रवास व्हायचा, तेव्हा वाटेवर दिसणारी शिवाजी विद्यापीठाची भव्य मुख्य इमारत आणि तिच्यासमोरच्या विस्तीर्ण प्रांगणात पसरलेल्या मनोवेधक बगिचामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखणा, चित्ताकर्षक अश्वारुढ पुतळा मला सदोदित आकर्षित करीत आला आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये कोल्हापूर बदललं, मी बदललो तरी माझ्या मनातलं हे आकर्षण कधीही कमी झालं नाही. दरवेळी हा पुतळा आणि विद्यापीठाचा कॅम्पस मला नित्यनूतनच भासत आला आहे. आजही विद्यापीठाचा प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू होऊन एक वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा काम करता करता कंटाळा आला की, माझ्या कार्यालयाच्या खिडकीतून मी या कॅम्पसवर नजर फिरवतो, महाराजांच्या पुतळ्याकडं पाहतो आणि कामाचा थकवा कुठल्या कुठं पळून जातो. एक वेगळं अभिन्न असं नातं या साऱ्या भौतिकाशी जोडलं गेल्यासारखं झालं आहे. हे नेमकं काय आहे, हे शब्दांत नाही सांगता येणार, पण तसं आहे खरं!
पश्चिम महाराष्ट्रात उच्चशिक्षणाचा प्रसार, प्रचार आणि विकास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाची 18 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापना झाली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हापासून आजतागायत शिवाजी विद्यापीठानं 'ज्ञानमेवामृतम्' हे ब्रीद प्रमाण मानून ज्ञानदानाचं पवित्र कार्य अखंडितपणे चालविलेलं आहे. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचे लाभ पोहोचविण्याची खूप तळमळ होती. त्यांच्या या तळमळीतून विद्यापीठात 'कमवा व शिका' हा अभिनव उपक्रम सुरू झाला. गोरगरीब पण शिक्षणाची आस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या श्रमदानाचं मोल आणि संदेश यांची पार्श्वभूमी असणाऱ्या या उपक्रमाचा लाभ आजतागायत हजारो विद्यार्थ्यांना झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असलेल्या कुटुंबांमधून प्राध्यापक, व्यावसायिक, उद्योजक निर्माण करण्यामध्ये 'कमवा व शिका' योजनेचा खूप मोलाचा वाटा राहिला आहे. अनेक गोरगरीब कुटुंबातली मुलं आजही या योजनेचा लाभ घेऊन आपलं उच्चशिक्षणाचं ध्येय साध्य करत आहेत.
शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही खरं म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील उच्चशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी झाली. पण या स्थापनेचं स्वरुप हे केवळ संस्थात्मक स्वरुपाचं नव्हतं, तर त्यामागे खूप मोठं असं सामाजिक, शैक्षणिक कारण होतं. ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची संधी पोहोचलेलीच नाही, अशा समाजघटकांना ती उपलब्ध करून देणं, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांना त्या प्रवाहामध्ये सामील करून घेणं आणि ग्रामीण भागातील गोरगरीब, तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षणाचे लाभ पोहोचविणं असे उद्देश विद्यापीठाच्या स्थापनेमागे होते. विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश परिपूर्ण झाला असे म्हणण्याऐवजी, त्या परिपूर्णतेच्या दिशेनं विद्यापीठाची वाटचाल झाली आणि हा परिपूर्णतेचा ध्यास आजही हे विद्यापीठ बाळगून आहे.
विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्व जिल्ह्यांमध्ये उच्चशिक्षणाच्या संधींची उपलब्धता आणि शैक्षणिक विस्ताराचं उद्दिष्ट विद्यापीठानं जोपासलं. पूर्वी केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांपुरत्याच मर्यादित संधी उपलब्ध असणाऱ्या या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील संधी विद्यापीठानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या. सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि विकासाच्या अशा संधी उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा उद्देश निश्चितपणे सफल झाला.
आजघडीला अभियांत्रिकी, फार्मसी या शाखांबरोबरच बी.टेक., एम.टेक., बायो-टेक्नॉलॉजी, नॅनो-टेक्नॉलॉजी, मायक्रो-बायोलॉजी अशा अत्याधुनिक व्यावसायिक शिक्षण शाखांचा विकास विद्यापीठानं केला. या धोरणाचा परिणाम म्हणजे विद्यापीठाच्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतून उत्तम दर्जाचे अभियंते बाहेर पडले. ते सर्व विविध राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देशविदेशांत उत्तम कामगिरी बजावत आहेत. अशा प्रकारे, शिक्षण, संशोधन आणि गुणवत्ता विकास अशा तीन बाबींच्या बळावर विद्यापीठानं आपली वाटचाल प्रगतीपथावर ठेवली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू डॉ. एन.जे.पवार आणि प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या नेतृत्वाखाली सध्या आधुनिक आणि ग्लोबल शिवाजी विद्यापीठाची पायाभरणी करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आयसीटीबेस्ड कार्यप्रणालीचा अंगिकार आणि वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा सर्वंकष वापर करून घेण्याच्या दृष्टीनं विद्यापीठाच्या संगणक केंद्रात अद्ययावत स्वरुपाच्या डेटा सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. कॅम्पस नेटवर्किंगचं कामही पूर्ण होत आहे. नॅशनल नॉलेज नेटवर्कशीही विद्यापीठ जोडले गेले आहे. विद्यापीठाच्या १६ अधिविभागांत स्मार्ट क्लासरुमचा उपक्रमही यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी क्लासरुममध्ये स्मार्ट-बोर्डही बसविण्यात आले आहेत. ग्रंथालयामध्ये युजीसी-इन्फोनेट प्रकल्पांतर्गत '-जर्नल'च्या वापरासही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) पर्स (प्रमोशन ऑफ युनिव्हर्सिटी रिसर्च ॲन्ड सायंटिफिक एक्सलन्स) या योजनेअंतर्गत विद्यापीठाला अनुदानं मंजूर झाली आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल सातत्याने विहित वेळेत जाहीर करणे आणि सर्व परीक्षांचे उत्तम नियोजन याबद्दल मा. कुलपती महोदय आणि राज्य शासन यांनीही वेळोवेळी कौतुक केलं आहे. विद्यापीठाचा हाच लौकिक कायम ठेवण्यासाठी आणि परीक्षाविषयक सेवासुविधांचा आधुनिक पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) सहाय्यानं डिजिटल युनिव्हर्सिटी डिजिटल कॉलेज (डीयुडीसी) ही संकल्पना यशस्वीपणे राबविली जात आहे. लेखा विभागाच्या कामकाजात सुधारणा व एकसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठानं सन २००८मध्ये तयार केलेली लेखा संहिता किरकोळ फेरफारांसह एप्रिल २०१२ पासून महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला, ही सुद्धा अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा एकत्रित उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं विद्यार्थी सुविधा केंद्र (स्टुडंट फॅसिलिटी सेंटर) सुरू करण्यात आलं आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून सुवर्णमहोत्सवी अभ्यासिका, सुवर्णमहोत्सवी 'कमवा आणि शिका' मुलींचे वसतिगृह आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचाही प्रारंभ करण्यात आला आहे.
विद्यापीठाविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे, परंतु जागेची मर्यादाही लक्षात घेतली पाहिजे. 51व्या वर्धापनदिनानिमित्त माझ्या विद्यापीठाबद्दल वाचकांना काही सांगावं, असं मनापासून वाटलं, म्हणून लिहीलं. पुढील वाटचालीसाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा मात्र हव्यात.

५ टिप्पण्या:

  1. Alok, vachun khup chhan vatle..aplya vidhyapithane keleli pragati vakhananyajogi ahech, shivay abhimanaspad sudhha ahe...lekhachi suruvat vachateveli vidhyapith samor ale ani aple te vidhyapithatil divas athavale...khup chhan...asech lihit raha...abhinandan. .......Bhalchandra

    उत्तर द्याहटवा